मुंबई : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदार यादीतील संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची चौकशी व पुरावे गोळा केले जाणार आहेत.

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
मोदींच्या पदावर प्रश्नचिन्ह
पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत काँग्रेस उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 2020 मध्ये आचारसंहिता भंग झाला होता आणि निवडणूक आयोगानेही अंशतः ते मान्य केल्याचा दावा त्यांनी केला.
मतदार यादीतील संशयाचे विश्लेषण
राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी चार महिन्यांत मतदारसंख्येत तब्बल 41 लाखांची वाढ झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात काँग्रेसने विविध मतदारसंघांमध्ये पाहणी केली असून त्याचा अहवाल दिल्लीतील बैठकीत सादर करण्यात आला आहे. त्याचाच आधार घेत ही समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच सविस्तर अहवाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवायची असेल तर निवडणूक आयोगाने अनेक पातळ्यांवर बदल करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.



