भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ शहरात सोमवारी (६ जुलै) रात्री भरवस्तीत झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडी पुला परिसरातील हनुमान मंदिराजवळ अज्ञात दुचाकीस्वारांनी एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, गोलू रायसिंग पंडित हे त्यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक गोळी झाडली. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तातडीने पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
गोळीबाराचे नेमके कारण काय होते, किती गोळ्या झाडण्यात आल्या, तसेच या घटनेत गोलू पंडित जखमी झाले आहेत का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिकृत तपासानंतरच गोळीबारामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत भुसावळमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


