मुंबई : वृत्तसंस्था
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडत असून उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत शपथविधी झाल्याने विरोधकांकडून त्वरित टीका करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शपथविधी 15 दिवसांनी घेतली असती तर काय फरक पडला असता असा सवाल उपस्थित केला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी पलटवार करत म्हटले, “सुनेत्रा वहिनींबाबत बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. जयंत पाटीलांचे वक्तव्य गुळसट असून त्यांनी महाराष्ट्राला किंवा महिलांना देण्यासारखा सल्ला नाही. त्यांची पातळी एवढी नाही. जयंत पाटीलांनी आपली मळमळ ओकू नये.”
रुपाली ठोंबरे यांनी या संदर्भात जोरदार उदाहरणे देत म्हटले, “राजमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी बाईसाहेब, झाशीची राणी यांच्या महाराष्ट्रात जयंत पाटील असं बोलणार असतील तर त्यांना माझा फुकटचा सल्ला – आपली घरातील बायकांना व मुलांना नियमावली लिहा की कुठले कार्य करायचे किंवा नाही हे स्वातंत्र्य आपल्याला आहे.” याचवेळी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पार्थ पवार व सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर रूपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया देत त्यांना “शूर्पणखा” ही उपमा देऊन चांगलाच समाचार दिला आहे. राजकीय नेत्यांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता जोर धरत आहेत, आणि राजकीय गल्लीत याबाबत चर्चा सुरू आहे.


