Home » महाराष्ट्र » गृह खाते झोपले आहे का? महिला गायब प्रकरणावर सरकारवर वडेट्टीवारांची घणाघाती टीका

गृह खाते झोपले आहे का? महिला गायब प्रकरणावर सरकारवर वडेट्टीवारांची घणाघाती टीका

नागपूर  : वृत्तसंस्था

राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातून तब्बल २ लाख ५६ हजार महिला व मुली गायब असल्याचा धक्कादायक दावा करत, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकार एक-दोन महिला सापडल्यावर ८० टक्के प्रकरणे निकाली निघाल्याचा दावा करते, मात्र ही आकडेवारी बोगस असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. “महिला आणि मुलींच्या अपहरणामागे संघटित रॅकेट असून, ते उघड करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. गृह खात्यावर टीका करताना त्यांनी, “लहान मुलं, मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात गायब होत असताना गृह खाते झोपले आहे का?” असा सवाल उपस्थित केला. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्य सरकार असंवेदनशील असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत, “त्यांना महाराष्ट्र लुटण्यात मजा आहे, इतर प्रश्नांबाबत त्यांना काही देणं-घेणं नाही,” अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *