मुंबई ; वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृती खराब झाली असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून काहीही खाल्ले नसल्याने खूप जास्त वीकनेस आला आहे. मी त्यांना म्हणाले की उठू नका आणि तब्येतीची काळजी घ्या. तसेच येथे स्वच्छतेचा मोठा प्रॉब्लेम येत असल्याची तक्रार जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे येथील बीएमसीला सांगून येथील स्वच्छतेचे काम करण्यात यावे. त्यानुसार मी आयुक्तांना बोलणार आहे, अशी माहिती सुळे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी. तसेच पाहिजे असेल तर लगेच एक दिवसाचे अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्गी लावा. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला कोणाचाच विरोध नाही, मग मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्याचे वाक्य होते आमचे सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ, आता काय झाले. एवढे मोठे बहुमत दिले आहे महायुतीला तर देऊन टाकायला पाहिजे आरक्षण. लोकशाही आहे आणि आम्ही हुकुमशाही होऊ देणार नाही. चर्चेला आम्ही सगळे तयार आहोत. सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढावा. ११ वर्षे झाले सत्ता आहे तर मराठा आरक्षण देऊन दाखवावे, असे आव्हान देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळे निघून जात असताना मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर देखील पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्याचा प्रकार यावेळी घडला. शरद पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले असा आरोप सुद्धा यावेळी आंदोलकांनी केला.



