मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक योग दिनाच्या निमित्त मुंबईतील उपक्रमात सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांनी मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिन जगभर साजरा होऊ लागला. आज योगाचे महत्त्व पटल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वजण योग दिन साजरा करत असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

याशिवाय अनेक रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्याचे सामर्थ्य योगसाधनेत आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईने इतर व्यसने करण्यापेक्षा योगाचे व्यसन धरायला हवे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना शिवसेनेतील बंडाबाबत टिप्पणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगितले, “२१ तारखेलाच आम्ही मोठा योग केला होता. तो मॅरेथॉन योग होता. त्या योगाची सुरुवात मुंबईपासून झाली आणि त्यामुळेच २१ जूनला महाराष्ट्रात खूप बदल घडले, आम्ही इथे विकास पाहत आहोत. आमचे सरकार लोकांसाठी काम करत आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या दिशेने काम करत आहोत. सत्ता परिवर्तन केले म्हणून विकास झाला,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.



