मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकत्र आणि एकाच दिवशी जाहीर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे हे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.

मंगळवारी मतदान पार पडले होते आणि निकाल आज जाहीर होणार होते. मात्र, काही ठिकाणी मतदान पुढे ढकलल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे न्यायालयाने हस्तक्षेप केला. या आदेशामुळे 20 डिसेंबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू राहणार असून एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मनाई आहे.
आयोगाने यापूर्वी तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याचे नियोजन केले होते. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पहिल्या टप्प्यात, जिल्हा परिषद निवडणुका दुसऱ्या आणि महानगरपालिका निवडणुका तिसऱ्या टप्प्यात घेण्याची योजना होती. पण न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल जाहीर करण्याच्या तारखेत बदल झाल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील कार्यक्रमात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
राज्यातील 20 जिल्हा परिषदा आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यामुळे अडचणीत आहेत. तर 29 महानगरपालिकांपैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका आरक्षण घोळात अडकल्या असून उर्वरित 27 महानगरपालिका निवडणुका तातडीने घेता येऊ शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदा आधी महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून, 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्यातील 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी चर्चा आहे. गुरुवारी आयोगाने महानगरपालिका आयुक्तांची बैठक बोलावली असून, मतदार याद्या, तांत्रिक आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला एकत्र जाहीर झाल्यानंतर ताबडतोब महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषद निवडणुका मात्र आरक्षणाच्या कारणाने अद्याप अनिश्चित आहेत.



