मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात बजरंग दल व विहिंपचे मोठे आंदोलन सुरु होते मात्र नागपूर येथे आंदोलनानंतर झालेल्या दंगलीमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. वंचित बहजुन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांनी राज्यातील एका विषारी मंत्र्याकडून दररोज समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत नागपूरची दंगल एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला आहे.

गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठे रणकंदन माजले आहे. मंत्री नीतेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याचे भाष्य केल्यानंतर हिंदुत्त्वादी संघटनांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सोमवारी या प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर नागपुरात रात्रीच्या वेळी मोठी दंगल उसळली. त्यात 33 पोलिसांसह अनेकजण जखमी झालेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनाक्रमावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या घटनेसाठी एकप्रकारे राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज खुलेआमपणे साजात द्वेष पसरवण्याचा व दुही पिकवण्याचे काम करत आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोक आणले जात आहेत. हा एका मोठ्या सूनियोजित कटाचा भाग आहे, असे आंबेडकर मंत्री नीतेश राणे यांचे नाव न घेता म्हणाले. यावेळी त्यांनी नागपूरसह राज्यातील सर्वच जनतेला अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचेही आवाहन केले.



