जळगाव | पब्लिक लाईव्ह न्यूज : जळगाव शहरातील हॉटेल दरबार ते सीएनजी गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय २९) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मंगला माळी या नेहमीप्रमाणे मुलासोबत पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेच्या जोरामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मंगला माळी या टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त आणि सतर्क नागरिकांनी टँकरचा पाठलाग करून आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलजवळ वाहन अडवले. त्यानंतर चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला.
मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव व बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची तसेच शहरात अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


