नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यानी कर्जमाफ होणार असल्याची आशा होती मात्र ती आशा मावळल्यानंतर अनेक शेतकर्यांनी आपले आयुष्य संपविल्याच्या घटना ताज्या असतांना आता सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे गट नं. 490 या ठीकाणी त्र्यंबक सखाराम शेळके या शेतकर्याची शेती असून एक एकर क्षेञात त्यांनी कोबी पिकाची लागवड केली. पिक चांगले येऊनही बाजारात कवडीमोलाने कोबी विकला जात असल्याने अखेर त्यांनी उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला.

कोबी लागवडीपासून ते आतापर्यंत महागडी खते व कीटकनाशके मिळून जवळजवळ एक लाख रुपये भांडवल कोबी पिकाला लागले. त्यानंतर तीन महीन्यापूर्वी पंधरा रुपये कीलोप्रमाणे विक्री होणारे कोबीपिकास सध्यस्थितीत तीस पैसे कीलोप्रमाणे सुद्धा व्यापारीवर्ग खरेदी करत नाहीत. त्यामुळे झालेला खर्च सुद्धा वसुल होत नसल्याची खंत शेतकरी शेळके यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी कोबीपिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला. खते, किटकनाशके यांच्यातील दरवाढ आणि कवडीमोलाने विक्री हाेणारे पिक यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.



