मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मुस्लिम नेत्यांसह शिवसेना ठाकरे गटानेही वक्फ विधेयकाला मोठा विरोध केला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनींसह सर्व देवस्थानांच्या जमिनी मोदी सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांना देणार असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता नमाज पडायचेच बाकी असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला आहे. तर संजय राऊत नव्यानेच मुस्लिम बनले आहेत म्हणून ते अदाब अदाब करत असल्याची बोचरी टीका केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मुळात हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी वक्फ बोर्डचा कायदा सरकारने आणला नाही. संजय राऊत यांच्या डोक्यात एवढे विषय असतात आणि ते नव्याने मुसलमान झाले आहेत. नव्याने मुसलमान झाल्यामुळे दिसेल त्याला अदाब अदाब करत असतात. स्वर्गीय बाळासाहेबांनी मुस्लिम लोकांचा मतांचा अधिकार काढून घ्या हा शिवसेनेचा प्रवास आहे. आज उबाठा काय करत आहे? उबाठा गट वक्फ बोर्डाच्या धर्मांड लोकांच्या बाजूने उभा राहत आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मागे मी म्हटले होते उद्धव ठाकरे यांनी फक्त नमाज पडायचेच बाकी राहिले आहे. त्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध राहिला नाही. वक्फ बोर्डाचा आणि हिंदू बिलाचा काही प्रश्न नाही. हिंदूंच्या सर्व देवस्थानांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे कुठलेही देवस्थान असू द्या. तुम्ही इथले देवस्थान पाहा तहसीलदार या देवस्थानाचा प्रमुख आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर त्याचा प्रमुख आहे. कुठलाही देवस्थान सरकारच्या नियंत्रणात आहे. वक्फ बोर्ड सरकारच्या नियंत्रणात नव्हते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, अमित शहा यांनी भाषण केले त्यांनी सांगितले आहे की 2013 पर्यंत किती प्रॉपर्टी होती. 2013 ते 2025 पर्यंत किती वाढली. याला कुठेतरी नियंत्रण आणणे गरजेचे होते आणि वक्फ बोर्डावर नियंत्रण आणणे म्हणजे मुस्लिम धर्माच्या विरोधी काही नव्हते त्यांच्या नमाज विरोधी, विवाह विरोधी, असे काहीच नव्हते. वक्फ म्हणजे काय दानधर्म संस्था आहे त्याच्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सरकारने जे बिल आणले आहे अत्यंत स्वागतार्ह आहे. सगळ्या हिंदूंनी त्याचे स्वागत केले पाहिजे. मात्र दुर्दैवाने मुस्लिम खासदारांनी मिळून त्याच्या विरुद्ध मतदान केले आणि आमच्या काही हिंदूंनी देखील मतदान केले आहे.



