मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक खळबळजनक प्रतिक्रिया येत असतांना आता पाकिस्तानवर कडक कारवाई करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचा दावा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणामुळे केव्हाच पाक किंवा अतिरेक्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. याऊलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकविरोधात अत्यंत कठोर निर्णय घेत आहेत, असे ते म्हणालेत.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये गत 22 एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटक मारले गेले. या हल्ल्याविरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना केंद्राने पाकविरोधात काही कठोर निर्णय घेतले. या निर्णयाचे कौतुक करताना एकनाथ शिंदे यांनी मोदींचे कौतुक व काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते गुरुवारी महाराष्ट्र दिनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच पाकविरोधात कडक भूमिका घेतली आहे. अॅक्शनवर रिअॅक्शन दिली आहे. पाकच्या हायकमिशनमधून 5 अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली. व्हिसा बंद केला. अटारी बॉर्डर बंद केली. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ देश सोडून जाण्याचे आदेश दिले.
मोदींनी नुकतीच तिन्ही संरक्षण दलांची बैठक घेतली. त्यांना देशाची सुरक्षा करण्याची व 140 कोटी जनतेचे संरक्षण करण्याची खुली सूट दिली आहे. असे कधी झाले होते का? यापूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक कुणी केली होती? सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर मोदींनी तत्काळ सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आताही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर मिळेल. पाकिस्तानचे नामोनिशाण मिटेल अशी सुरुवात झाली आहे.



