नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मूमधील पहलगाम हल्ल्याचा बदल भारतीय सैन्याने ६-७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केला. या मोहिमे अंतगर्त पाकिस्तान आणि पीओकेवर भारतीय सैन्याने हल्ला करून ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यापासून पाकिस्तान नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. सीमेपलीकडून झालेल्या या भ्याड कृत्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकच्या गोळीबाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी सरकारकडून भारतीय हवाई दलाला आता पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. हवाई दलाला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की,”जर त्यांना काही संशयास्पद दिसले तर ते पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ शकतात.” असे आदेशच देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच सर्वपक्षीय बैठकही होणार आहे. या बैठकीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होतील.
देशभरातील २७ विमानतळ सध्या बंद करण्यात आले आहेत. बहुतेक विमानतळ उत्तर भारत आणि पश्चिम भारतात आहेत. यामध्ये श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर आणि लुधियाना येथील विमानतळांचा समावेश आहे. बुधवारी (७ मे) पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील (LOC) गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात चार मुले आणि एका सैनिकासह १३ जणांचा मृत्यू झाला. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने हा गोळीबार केला.
भारतीय सैन्यानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे आणि गोळीबारात सहभागी असलेल्या त्यांच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, जोरदार गोळीबारामुळे स्थानिक लोकांना पीडितांना रुग्णालयात नेण्यात खूप अडचणी आल्या. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील काही सीमावर्ती गावांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे.



