Home » राष्ट्रीय » बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते ; शरद पवार !

बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते ; शरद पवार !

पुणे  : वृत्तसंस्था

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण असतांना दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. भारताच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य कुरघोड्या करतच आहे, त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. ते बारामती येथे माध्यमांशी बोलत होते.

बारामती येथे शरद पवार पत्रकारांशी बोलताना सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धावर भाष्य केले आहे. भारत-पाकिस्तान तणावावर आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अपीलबद्दल शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर “बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते”, असे म्हटले आहे. तसेच शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचे कौतुकही केले आहे. या कठीण काळात केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही देखील त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

ऑपरेशन ‘सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली, असे ट्विट शरद पवारांनी केले होते.

दरम्यान, पाकिस्तानच्या शनिवारी रात्री हल्ल्यानंतर भारताने त्यांच्या चार हवाई तळांवर हल्ला केला. वृत्तसंस्था एएनआय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी एक व्हिडिओ जारी केला. त्यात पाकिस्तानातील सियालकोटमधील दहशतवादी लाँचपॅडचे फुटेज आहे, जे बीएसएफने उद्ध्वस्त केले होते. येथून ड्रोन डागले जात होते.

शुक्रवारी संध्याकाळी 7.47 ते 10.57 दरम्यान पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील 26 शहरांमध्ये 550 हून अधिक ड्रोन डागले. हा हल्ला सैन्याने हाणून पाडला. शनिवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातवर हल्ला केला. राजौरी, पूंछ आणि जम्मूमध्येही जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात राजौरीच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

जम्मू शहरातही हवाई हल्ले सुरूच आहेत. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या श्रीगंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे. चंदीगड आणि अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *