मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिस ठाण्याच्या बाहेर जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. तसेच यावेळी त्यांनी अनेक पुरावे दाखवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच आता त्यांनी केलेल्या तीन मागण्यांना यश आल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत माहिती दिली की, फलटण आंदोलनानंतर तीन मागण्यांना यश आले आहे. 1) गोपाल बदनेची तात्काळ बडतर्फी 2) हत्या की आत्महत्या या प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी 3) संपदा मुंडे बद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर सर्व प्रकारच्या पब्लिक डोमेन मधून काढून टाकण्यासाठी गुगल आणि युट्युबला गृह खात्याकडून पत्र देण्यात आले असल्याची माहिती अंधारे यांनी दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, कालच्या आपल्या फलटणच्या आंदोलनानंतर सरकारच्या कानठळ्या बऱ्यापैकी उघडल्या आहेत. अखेर एसआयटीची घोषणा सरकारने केली. मात्र एसआयटी नको उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती हवी अशी मी वारंवार मागणी का करत आहे ते खालील एसआयटीतील नेमलेले पोलिस अधिकारी आणि त्यांचे कार्यक्षेत्र बघितल्यावर आपल्या लक्षात येईल.
या एसआयटीतील सात पैकी पाच अधिकारी हे फलटण आणि सातारा कार्यक्षेत्रातील आहेत. तर उर्वरित दोन पैकी वायकर नावाचे अधिकारी आणि गोपाल बदने हे एकत्रित कार्यरत होते. फलटण पोलिस स्टेशन हे स्थानिक राजकीय दबावामुळे छळ छावणी झाले आहे हे मी वारंवार मांडत आहे आणि त्याच फलटण तथा सातारा जिल्ह्यातील जर सात पैकी पाच अधिकारी एसआयटी देत असतील तर हे लोक पीआय सुनील महाडिक एपीआय जायपात्रे पीएसआय पाटील आणि दोन पीए शिंदे आणि नागटिळक यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्या इतपत भयमुक्त काम करू शकतील का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.



