जळगाव : प्रतिनिधी
मित्रांसोबत कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या आशुतोष दिलीप जोशी (वय २२, रा. गणेश नगर) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मासेमारी करणाऱ्यांसह पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दीड तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश नगरातील रहिवासी असलेला आशुतोष जोशी याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून तो मंदिर, संस्थांच्यावतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमावेळी भजन, कीर्तन सादरीकरण करुन उदनिर्वाह करीत होता. रविवारी सकाळी तो घराजवळील सागर जयराम कटारिया (वय २२), सोमय्या राजेश जैस्वाल (वय १६), राहुल चव्हाण (वय १६, सर्व रा. गणेश नगर, जळगाव) यांच्यासोबत शहरापासून जवळच असलेलया कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी आशितोष याचे मामा शिवराज जोशी यांच्यासह अन्य नातेवाईकांनी त्याला जाण्यास नकार देत आपल्याला वास्तूशांतीच्या विधीसाठी जायचे असल्याने आमच्यासोबत चल, असेही त्याला सांगितले. मात्र त्याने मित्रांसोबत बाहेर जायचे असल्याचे सांगत तो बंधाऱ्यावर गेला होता.
आशुतोष हा त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र सागर कटारिया, सोमय्या जैस्वाल, राहुल चव्हाण यांच्यासोबत पाण्यात पोहण्यासाठ उतरला. परंतू काठापासून थोड्या अंतरापर्यंत गेल्यानंतर आशितोष हा बुडत असल्याचे लक्षात येताच, त्याचा मित्र सोमय्या जैस्वाल याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र दोघे जण बुडत असल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात सोमय्याला वाचविण्यात यश आले, मात्र आशुतोष हा खोल खड्ड्यात बुडाला.



