Home » राज्य » मोठी बातमी : ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली दिलगिरी !

मोठी बातमी : ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली दिलगिरी !

पुणे : वृत्तसंस्था

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कथित तुलना केल्याच्या वादावर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता,” असे स्पष्ट करत त्यांनी मनःपूर्वक खेद व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी, विशेषतः भारतीय जनता पक्ष, त्यांच्या विधानावर तीव्र टीका केली. पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक होऊन वातावरण तंग झाले होते.

सपकाळ यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे ७० सेकंदांचे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला.

“मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला. भाजप व त्यांच्या समर्थकांकडून नियोजनपूर्वक अपप्रचार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती चिघळू नये आणि गैरसमज दूर व्हावेत यासाठी सपकाळ यांनी मंगळवारी अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली. “शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी नमूद केले.

खाली वाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पोस्ट जशीच्या तशी

मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.

प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.

शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू!

कठीण वज्रास भेदूं ऐसे भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी । मायबापाहूनि बहु मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥ अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *