नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असतांना अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजकोटच्या कोलीथड गावाचे रहिवासी असलेल्या रियाज भाई गाला यांना 14 फेब्रुवारी रोजी त्याच्या फोनवर एक मेसेज आला. हा मेसेज लग्नाच्या निमंत्रणाचा होता. रियाज भाई यांचेच नातेवाईक असलेल्या ईशान भाई यांनी हा मेसेज पाठवला होता. माझ्या लग्नाला नक्की या असा हा मेसेज होता. सोबतच एक पीडीएफ फाईल देखील पाठवण्यात आली होती. जेव्हा रियाज भाई यांनी ही पीडीएफ फाईल ओपन केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पीडीएफ ओपन करताच त्यांचं बँक अकाऊंट पूर्ण रिकामं झालं होतं. 75,000 हजार रुपये त्यांच्या खात्यामधून अचानक गायब झाले होते. मेसेज पाहाताच त्यांना प्रचंड धक्का बसला.

जेव्हा त्यांनी ही पीडीएफ फाईल ओपन केली तेव्हा त्यांच्या मोबाईलचा कंट्रोल हा सायबर गुन्हेगारांकडे गेला, आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच त्यांचं बँक अकाउंट रिकामं करण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार हे या गावातील पहिलंच प्रकरण नव्हतं तर यापूर्वी देखील त्या गावातील शेतकऱ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता. त्यांच्या खात्यातून 24 हजार रुपये गायब झाले होते.
दुसरीकडे केरळमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे, एक वृद्ध व्यक्ती पाच लाख रुपये घेऊन घाई-घाई बँकेत आला. मला माझ्या मामाला पैसे सेंड करायचे आहेत, असं त्याने बँकेतील कर्मचाऱ्याला सांगितलं. मात्र बँक कर्मचाऱ्याला संशय आल्यानं त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं की माझी पत्नी सीबीआयच्या डिजिटल अरेस्टमध्ये आहे. आणि पैसे पाठवले नाहीत तर ते तिला सोडणार नाहीत. बँकेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.



