मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक वादंग उठत असतांना आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने राज्याचे राजकारण तापण्याची मोठी शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजेंनी हिंदवी स्वराज्याचा मांडला आहे, आपल्याकडील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत हे सर्व चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे.

संभाजी भिडे पुढे बोलताना म्हणाले की पक्ष, संघटना शिवरायांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत आहेत. खरे तर छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते. त्यात त्यांना यश आले नाही, पण त्यांचा विचार पुढे आणला तो शिवरायांनी. छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी यांनी बलिदान दिले. सध्या छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून बलिदान मास पाळला जात आहे. यासाठी शनिवारी सांगलीतील शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी साडेसात वाजता मूक पदयात्रा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाजी भिडे म्हणाले की, शहाजीराजे म्हणाले होते की, मला स्वत:ला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे. मला स्वतंत्र राज्य निर्माण करायचे आहे. हिंदू… हिंदू… हिंदू समाज, हिंदू संस्कृती यांच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे आहे, असे म्हटले होते.
संभाजी भिडे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे जे बोलत आहेत, ते 100 टक्के चूक आहे. वाघ्याची जी कथा सांगितली जाते, ती सत्य आहे. आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे. तर आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. त्याचे प्रतीक म्हणून वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर राहिला पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही.



