सोलापूर : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस हे आज तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून सगळ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी होळकर यांनी पैसे दिले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून, वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्ट वाद केलाच पाहिजे का? तर असे काही नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.
वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून वाद निर्माण करून काहीही होणार नाही. धनगर समाज एकीकडे आणि मराठा समाज एकिकडे हे कशासाठी? हे अतिशय अयोग्य आहे. या विषयावर बसून मार्ग काढता येईल, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संभाजी महाराज यांना अनेक वेळा भेटण्याची वेळ दिली आहे. ते माझ्याशी फोनवर देखील बोलतात. ते मला येऊन देखील भेटतात. त्यामुळे त्यांना वेळ न देण्याचे काहीही कारण नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मृती स्थळावरून युवराज संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची वेळ मागितली असून त्यांची वेळ मिळाली नसल्याचे म्हटले होते. मात्र ते मला कधीही भेटू शकतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा दावा फेटाळला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा वाघ्या, त्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाभोवती आणि रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळच असलेल्या त्याच्या स्मारकामुळे उपस्थित केला जात आहे. शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. या पत्रात कुत्र्याच्या अस्तित्वाला समर्थन देणारे ऐतिहासिक पुरावे नाहीत असे म्हटले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देखील वाघ्या बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याची पुष्टी केली आहे. ज्यामुळे पुतळा हटवण्याच्या युक्तिवादाला बळकटी मिळते. या वादामुळे इतिहासकार, राजकारणी आणि सामान्य जनतेमध्ये वाद निर्माण झाला आहे, काहींनी असा युक्तिवाद केला आहे की वाघ्याचा पुतळा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अनावश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे वाघ्याचा पुतळा यापूर्वी 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या सदस्यांनी काढून टाकला होता, परंतु नंतर तो पुन्हा बसवण्यात आला. स्थानिक धनगर समाजाने वाघ्या हा खरोखरच एक खरा कुत्रा होता असे मानून पुतळा हटवण्यास विरोध केला आहे.



