मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत अनेक आश्वासन दिले होते मात्र आता राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून वातावरण तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवला आहे.

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत हल्लबोल केलाय. शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची मागणी केली असली तरी परिस्थिती बघून निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इथून पुढे स्वतःचं हित पाहावं असं म्हणत जर हे संपूर्ण कर्जमुक्ती करणार नसेल, तर आंदोलन हाती घेऊन यांना गाव बंदी करू.
कर्जमाफी देणार नसाल तर गावं बंदी मोहिम हाती घेणार असल्याचा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्याचबरोबर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ईसीबीसीतून लिंक सुरु करून देण्याचा शासन निर्णय काढला. त्यामुळे जरांगेंनी मंत्री मरलीधर मोहळ आणि आशिष शेलार यांचे आभार मानले आहे. असाच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. गोदावरी बंधाऱ्यात पाणी नसल्याने गोदापट्ट्यातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, गोदा बंधाऱ्यात पाणी सोडावं, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. शिवाय संपूर्ण कर्जमाफी केली नाही, तर गावबंदी करू असा देखील इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.



