पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या सोमवार (दि. 5 मे) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची मुद्रित प्रत घेता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कु लाळ यांनी दिली आहे.

यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. नुकताच सीआयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. तर अद्याप सीबीएसईचा निकाल लागणे बाकी आहे. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.
ऑनलाइन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाद्वारे स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे.
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. तसेच छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.



