जळगाव : प्रतिनिधी
शहरातील देवकर नगर परिसरातील कुटुंबिय दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेले असतांना त्यांच्या वाहनावर भरधाव कंटेनर येवून धडकले. या अपघातात जळगावातील ऋषभ सुरेशचंद तोडरवाल (वय ३८) व त्यांची पत्नी वृषाली ऋषभ तोडरवाल (वय ३६, दोघ रा. देवकर नगर) हे जागीच ठार झाल्याची घटना दि. ८ रोजी तामिळनाडूतील वेलूर येथे घडली. मंगळवारी रात्री त्या दाम्पत्याचे मृतदेह जळगावात आणल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माघारी येणाऱ्या दाम्पत्यावर दुर्देवी काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील देवकर नगरात राहणारे ऋषभ तोडरवाल हे सावदा येथील सुवर्ण पेढीमध्ये व्यवस्थापक आहे. काही दिवसांपासून ते पत्नी वृषाली, मुलगी चहेती, मुलगा तक्ष यांच्यासह सासरे, आतेसासू व दोन चालकांना सोबत वाहनाने चेन्नई येथे फिरण्यासाठी गेले होते. चेन्नईसह दक्षीण भारत फिरल्यानंतर ते रविवारी दुपारी माघारी येण्यासाठी निघाले. दुपारी त्यांनी जेवण `ले आणि त्यानंतर ते येत असतांना मुलांनी त्यांना खाऊ घेण्याकरीता हट्ट धरला. त्यामुळे ते तामिळनाडूतील वेलूर जवळील एका दुकानावर खाऊ घेण्याकरीता थांबले. त्यांनी वाहन रस्त्याच्याकडेला लावून वृषाली यांचे वडील दोन्ही मुलांना घेऊन दुकानावर गेले. त्यावेळी मागून भरधाव येणारे कंटेनर थेट वाहनावर येऊन धडकून ते कारवर उलटले. या अपघातात कारमध्ये बसलेले सर्व जण दबले गेले तर वाहनाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य राबविले. त्यांनी जेसीबी आणून कंटेनर बाजूला करुन वाहनातील सर्व जणांना बाहेर काढण्यात आले.
या भीषण अपघातात कारमध्ये बसलेले ऋषभआणि वृषाली हे दाम्पत्य जागीच ठार झाले, तर इतर तिघे हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर सोमवारी ऋषभ आणि त्यांची पत्नी वृषाली यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह तामीळनाडू येथून जळगावला येण्यासाठी निघाले होते. मंगळवारी रात्री मृतदेह जळगावात आल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणा अंत्यसंस्कार पार पडले.



