रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील तासखेडा येथे दि.१३ रोजी सक ाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने वडिलांसह मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर आजोबा ही जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत वडील समाधान अशोक कोळी (वय ३६) आणि त्यांची ११ वर्षांची कन्या मानवी कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्य माहितीनुसार, १३ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समाधान कोळी यांचे वडील अशोक माधव कोळी हे घरातील कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेवरून रुमाल काढत असताना त्यांना विजेचा शॉक लागला. तर आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी समाधान कोळी हे धावून आले. परंतु, तुटलेल्या विद्युत तारेचा त्यांच्याही शरीराला स्पर्श झाल्याने त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असलेली लहान मुलगी मानवी कोळी ही पुढे आली अन् तिलाही विजेचा जबर शॉक बसला. या घटनेनंतर या तिघांनाही तत्काळ सावदा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना भुसावळच्या रिदम हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन समाधान कोळी आणि मानवी कोळी यांना मयत घोषित केले. भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेमुळे तासखेडा गावात शोककळा पसरली आहे. तर ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवाराने साश्रुनयनांची बाप-लेकीला शेवटचा निरोप दिला. या अपघातामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर ईश्वराने त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.



