Home » महाराष्ट्र » राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली !

राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार आणि अजित पवार गटांमधील एकीकरणाच्या चर्चांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे अचानक ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गट एकत्र येण्यासाठी वातावरणनिर्मिती करत असताना, अजित पवार यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयाने शरद पवार यांनी मनोमीलनाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या.

मंगळवारी (17 जून 2025) पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “भाजप आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या संधीसाधूंना आम्ही साथ देणार नाही.” या वक्तव्यमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असताना, दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचालींना गेल्या काही महिन्यांपासून वेग आला होता. शरद पवार यांनी पक्षाच्या एकीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीवर सोपवला होता. यानुसार, खासदार आणि आमदारांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती.

शरद पवार गटातील काही खासदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यास उत्सुक होते, तर अजित पवार गटातील काही नेतेही एकीकरणाला अनुकूल होते. यासाठी दोन्ही बाजूंनी बैठका आणि बोलणी सुरू होती. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने या सर्व चर्चांना अचानक पूर्णविराम मिळाला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याबाबत अजित पवार गटाकडून बोलणी सुरू होती. शरद पवार गटाने या निवडणुकीसाठी सहा जागांची मागणी केली होती, आणि अजित पवार यांनी चार जागा देण्यास सहमती दर्शवली होती. ही बोलणी अंतिम टप्प्यात असतानाच, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी परस्पर ‘निळकंठेश्वर’ नावाचे स्वतंत्र पॅनल जाहीर केले.

यामध्ये शरद पवार गटाच्या एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. या कृतीने शरद पवार गटात नाराजी निर्माण झाली. प्रतिसादात, शरद पवार यांनी तातडीने पावले उचलत युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बळीराजा’ पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. या घडामोडींमुळे दोन्ही गटांमधील तणाव पुन्हा वाढला आणि एकीकरणाच्या सर्व शक्यता धूसर झाल्या.

अजित पवार यांच्या एकतर्फी निर्णयानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. बैठकीत अजित पवार यांनी परस्पर पॅनल जाहीर करण्याच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

“एकीकरणाच्या चर्चा सुरू असताना अजित पवार अशी वागणूक देत असतील, तर भविष्यात ते काय करतील?” असा प्रश्न उपस्थित झाला. याच बैठकीत शरद पवार यांनी ठामपणे निर्णय घेतला की, अजित पवार किंवा भाजप यांच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत युती केली जाणार नाही.

शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकीकरणाच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. माळेगाव निवडणुकीतील अजित पवार यांच्या कृतीने दोन्ही गटांमधील अविश्वासाचा खड्डा आणखी खोल झाला आहे. शरद पवार गटाने आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे, तर अजित पवार गटानेही स्वतःची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *