मुंबई : वृत्तसंस्था
देशात भाजपच्या वतीने इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने ‘संविधान हत्या दिवस’ पाळण्यात येत आहे. याला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन देखील केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

आपत्काळ किंवा आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा होऊ शकतो? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. संघाचे संस्थापक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांना इंदिरा गांधी यांना अटक केली होती. मात्र, तुरुंगातून त्यांनी जो पत्र व्यवहार केला होता, तो एकदा पहा, असा सल्ला देखील राऊत यांनी भाजपला दिला आहे. त्यात देवरस यांनी देखील आणीबाणीला समर्थन दिले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जाहीर पणे आणीबाणीचे समर्थन केले होते. त्यांनी खुले समर्थन दिले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक आणीबाणीत आमच्या मार्मिक साप्ताहिकावर धाडी पडून तेव्हा प्रेस बंद केली होती. तरी देखील आम्ही त्यांना समर्थन दिलं होते. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. भारतीय घटनेतील तरतुदीनुसार देशांमध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अशा वेळी अशांतता निर्माण करण्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील काही शक्ती काम करतात. तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधान मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने दिलेली आहे. याचा अभ्यास देखील या लोकांनी करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.



