मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात यंदाच्या वर्षाअखेर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते एकत्र येणार अशी चर्चा आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंनाच सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे.

अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रहिताचा विचार करत कुणी आमच्यासोबत येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ, असे वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आमचे विचार सोडले. ते आता जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत वेगळी भूमिका घेत आहेत. जे चांगलं आहे, त्याला चांगले म्हंटले पाहिजे. पण ते विरोधासाठी विरोध करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी त्यांची आधीची भाषा बदलली. आम्ही आमची भाषा आणि लाईन कधीच बदलली नाही. कुठेतरी इगो बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे यांनी जायला हवे. दोन ठाकरे एकत्र येतील की नाही हे तेच ठरवतील. आम्ही आमचं संघटन वाढवू, ताकद वाढवू, असे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे हे म मराठीचा विचार न करता म मतांचा विचार करतात. मराठीच राजकारण ठाकरे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही विकास कामांच्या जोरावरच लोकांकडे मतं मागणार असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले.



