नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना आता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावात घडलेल्या प्रकारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तीन तरुणी, ज्या महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत, त्या आपल्या मित्रांसोबत लॉजवर गेल्याची घटना 21 जुलै रोजी घडली.

कॉलेज सुटल्यानंतर दुपारी, या तिन्ही तरुणी आपापल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसा रोडवरील ‘हॉटेल गारवा लॉज’ येथे गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला याची माहिती मिळाल्यानंतर, तो आपल्या दोन मित्रांसह तातडीने लॉजवर पोहोचला. लॉजवर बहिणीला पाहताच त्याने संताप व्यक्त केला आणि तिथेच मोठा राडा झाला. या वादानंतर संबंधित भावाविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे.
संबंधित तरुणीचा भाऊ जेव्हा लॉजवर गेला तेव्हा त्याने त्याच्या बहिणीला रंगेहात पकडले. यावेळी भाऊ आणि त्या तरूणांत वाद झाले. घाबरलेल्या तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. यात तरुणीचा एक हाथ मोडला. त्यानंतर तरुणीच्या भावाने अन्य दोघांच्या मदतीने तरुणाला लॉजच्या बाहेर काढले व भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करत पोटात खणजर खुपसले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर तीन तरुणांनी आम्हा तिघींना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि तेथे आमच्यावर अत्याचार केला, अशी तक्रार पीडित तरुणींपैकी एकीने दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तिघांवर बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे.
त्याचवेळी, लॉजमध्ये मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून, अल्पवयीन आरोपीसह इतर दोघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. सद्यःस्थितीत दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा तपास सुरू आहे आणि पुढील कारवाई तपासाअंती निश्चित होईल.



