जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील नेरी येथे मासे घेण्याकरीता जात असलेल्या साहिल मोहम्मद खाटीक (वय-२३, रा. बिलाल चौक तांबापुरा) या तरुणाला भरधाव काँक्रीट मिक्सरने चिरडले. ही घटना मंगळवार दि. २ रोजी सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळा गावाजवळ घडली. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर याठिकाणी त्याच्या कुटुबियांनी एकच आक्रोश केला.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापुरा परिसरात राहणारा साहील खाटीक हा तरुण मंगळवारी सकाळी मासे घेण्याकरीता (एमएच १९, ईक्यू ३१३२) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. यावेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १५, जीव्ही ५६३०) क्रमांकाच्या सिमेंट काँक्रटीच्या मिक्सरने धडक दिली. तरुण हा रस्त्यावर पडल्याने त्या मिक्सरने त्याला चिरडल्याने साहील खाटीक याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीचा चुराडा झाला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत साहील याला मयत घोषीत केले.
साहिलचा अपघात झाल्याची माहिती तांबापुरा येथील त्याच्या घरी कळताच कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरातील तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृत्यु झाल्याचे समजताच त्याचे वडीलांसह कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. यावेळी जिल्हारुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. साहिल मोहम्मद खाटीक हा तरुण त्याच्या वडीलांसह महामार्गालगत रिलायन्स पेट्रोल पंपा जवळच मच्छी विक्रीचे दुकान लावत होता. शनिवारचा आठवडे बाजार असल्याने माल घेण्यासाठी तो नेरी (ता. जामनेर) जात असतांनाच त्याचा अपघाती मृत्यु ओढवला. साहिल पश्चात चार बहिणी आई-वडील असा परिवार असून चार बहिणींच्या एकुलत्या भावाचा असा मृत्यु झाल्यान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



