मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार म्हणजे करणार काय उखडायचे ते उखाडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, हे मराठी माणसांचे राज्य आहे. आमच्या बापजाद्यांनी (106 हुतात्मांनी) संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे, तुम्ही दिले नाही, असे म्हणत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोकं आहात. आज मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्ही शांत आहात, ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी आक्रमक होण्याची वेळ आली तर वेळप्रसंगी आम्ही आक्रमक होणार, तुम्ही मोरारजी देसाई होत आहात का? मराठी आग्रह धरतो म्हणून काय आम्हाला गोळ्या घालणार आहात का? असा सवाल राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही गुजरातमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये.तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर हिंदी लादा. तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा काय करताय ते पहा.अमित शहा सांगतात की मी पहिले गुजराती आहे मग आम्ही पहिले मराठी नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हा शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, काय करायचे ते करा.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली आहे. 50 खोके एकदम ओके या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल हे जालन्याचे तेव्हाचे काँग्रेस आमदार होते. आता कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आहेत. त्यांनी बोलताना सांगितले की विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले, हे सर्व पैसे शासकीय वाहनातून पैशाचे वाटप सुरू होते, आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, यामुळे मला भाजपमध्ये यावे लागले, असे कैलास गोरंट्याल यांनी म्हटल्याची आठवण उबाठाचे नेते संजय राऊत यांनी करुण दिली. त्यामुळे खोक्याची भाषा फडणवीसांनी करु नये असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या 100 जागांवर कशी हेराफेरी केली ही मोहीम राहुल गांधी यांनी सुरू केली आहे. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे.त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री आहेत, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले आहेत त्या धक्क्यातून हे सावरले नाहीत म्हणून त्यांना उद्धव ठाकरेंचे नाव प्रत्येकवेळी घ्यावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांना गमतीजमती करण्याची सवय आहे, त्याकडे विनोद म्हणून पाहिले पाहिजे.



