नाशिक : वृत्तसंस्था
एका अल्पवयीन मुलीने बदनामीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून तसेच सततच्या त्रासाला कंटाळून व सोशल मीडियावर फोटो टाकत बदनामी केल्याने या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या गणेश भांगरे (वय 20, रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अक्षय मदन वरठे (वय 21, रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अतिष राजकुमार वैद्य यांनी मयत मुलीच्या गळ्यात हात घालून काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत समाजात बदनामी झाली. ही बदनामी सहन न झाल्याने तिने घरात गळफास घेत आत्महत्या केली.
दोघे संशयित कॉलेजमध्ये वेळोवेळी येऊन तिला आरोपीसोबत जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होते. या प्रकारामुळे मुलीवर मानसिक ताण निर्माण झाला होता. आरोपींनी फिर्यादीच्या मुलीचे इन्स्टाग्राम युजर आयडी व पासवर्ड वापरून तिचे सोशल मीडिया खाते उघडले. त्यानंतर, तिचा व आरोपी अक्षय वरठे याचा गळ्यात हात घालून काढलेला फोटो त्या इन्स्टाग्राम खात्यातून अक्षय वरठे याच्या इन्स्टाग्रामवर पाठवून तो तिचा बॉयफ्रेंड आहे, असा मजकूर सुद्धा लिहून फोटो पोस्ट केला. त्यामुळे मुलीची समाजात आणि कॉलेजमध्ये बदनामी झाली. त्यानंतर गणेश भांगरे नामक व्यक्तीने मुलीला फोन करून अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे, तिच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवून तिचा मानसिक छळ केला. या सर्व प्रकारांच्या एकत्रित परिणामामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



