मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत. असं असताना मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी या आधी आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता काही अटी-शर्तींसह त्यांना येथे आंदोलन करता येणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांच्यासोबत फक्त पाच हजार आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
आंदोलनासाठी अटीशर्थी कोणत्या?
१) नियम क. ४ (६) (च) नमुद आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.’
२) नियम क. ५ नुसार ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन परवानगी देण्यात येईल. तसेच आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शन पर्यंत येतील. त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्कीग करीता नेण्यात यावीत.
३) नियम क. ६ मध्ये आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक आहे. तसेच आझाद मैदानाचे ७००० स्कवेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठया संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. तसेच आपले अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुध्दा दिनांक २९/८/२०२५ रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली आहे, त्यांचा आंदोलनाचा हक्क सुध्दा बाधित करता येणार नाही, त्यामुळे ५००० आंदोलकांमध्ये त्यांचा सुध्दा समावेश असेल, त्यामुळे त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
४) नियम क. ७ मध्ये नमूद असल्याप्रमाणे विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही.
५) नियम क. ८ मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
६) नियम क. १० मधील आंदोलनाची वेळ सकाळी ९.००. ते सायंकाळी ६.०० याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
७) नियम क. ११ (ज) नुसार सहभागी व्यक्ती ही विनिर्देशित क्षेत्रात कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर-कचरा टाकणार नाहीत असे महत्त्वाचे नियम असून इतर सुध्दा नियम नमुद केलेले आहेत.
८) नियम क. ४ (ग) मध्ये आम्हांस असलेल्या अधिकारान्वये आपणांस सूचित करण्यात येत आहे की, आपले आंदोलनाचे कालावधी दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत आहे, त्यानुसार श्री. गणेश विर्सजन दरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत याप्रकारचे आपणाकडून किंवा आपले आंदोलकाकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपले आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृध्द व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.



