मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन सुरु केले होते. मराठा आरक्षण जीआरचा ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. मराठ्यांना आणि ओबीसींना त्याच्या हक्काचे आरक्षण मिळेल. आम्ही जे राजकारण शिकलो त्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हेच ब्रीद आहे. कधीही दोन समाज एकमेकांसमोर आणणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. गुरूवारी ते रायगड येथे माध्यमांशी बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही. ओबीसी आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही. मराठा समाज महाराष्ट्राच्या जडणघडणेतील महत्वाचा समाज आहे. त्यांच कल्याण झाले पाहिजे. त्याजबरोबर १८ पगड जातीवरही अन्याय होणार नाही, हीच आमची भावना आहे, असे फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल गुन्ह्यांवर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, “आताचे गुन्हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाले आहेत. त्यावर निर्णय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच घ्यावा लागणार आहे.”
“सर्व मराठ्यांना ओबीसीमध्ये टाका, ही मागणी स्विकारलेली नाही. ज्यांकडे अधिकृत पुरावे आहेत, त्यांनाज ओबीसीमध्ये घेतलं जाईल. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा आरक्षण जीआरचा अभ्यास केला आहे. या जीआरचा ओबीसीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं स्पष्ट केल आहे. भूजबळ यांच्याशी बोलण झालं आहे. त्यांच्या मनातीलही शंका दूर करू,” असे फडणवीस यांनी सांगितले.



