जळगाव : प्रतिनिधी
कुटुंब मुंबई व सुरत येथे गेलेले असताना चोरट्यांनी घरातून तीन लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना ५ सप्टेंबर रोजी आयोध्यानगरात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयोध्यानगरातील शिंपी कुटुंबीय २७ ऑगस्ट रोजी मुंबई व सुरत येथे गेले होते. त्यादरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील आरती कृष्णा शिंपी (४९) व त्यांच्या मैत्रीण बेबाबाई खोडपे यांचे तीन लाख ५० हजार ७५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारील मंडळींनी शिंपी यांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी आरती शिंपी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि चंद्रकांत धनके करीत आहेत.



