जळगाव : प्रतिनिधी
शिरसोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्याकडून बौद्ध समाजाचे स्मशानभुमी बेकायदेशीररित्या स्थलांतरीत करून तेथे व्यापारी संकुलाचे करत असलेले बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी शैलेश पितांबर सोनवणे तसेच शिरसोली प्र.न. गावातील समस्त अनुसुचित जातीचे सदस्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (१५ सप्टेंबर ) निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामपंचायत शिरसोलीचे ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांनी बेकायदेशीररित्या ठराव क्र.७ दिनांक २७.०७.२०१८ रोजी पारित करून घेतलेला असून त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी गट क्र.१ व गट क्र.७२७ वे महसूल दप्तरी बेकायदेशीररित्या फेरफार क्र. २०७२२ ही पारित करून घेतलेली असून गट क्र.१ वरील स्मशानभुमी गट क्र.७२७ मध्ये स्थलांतरीत केली आहे. या मिळकतीविषयी गावातील राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करत आहेत. ग्रामपंचायत शिरसोली यांनी सदर गट क्र.१ वरील स्मशानभुमी हटवुन तेथे व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने बांधकाम देखील सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे सदर गैरकृत्यामुळे आमच्या समाजातील मयत व्यक्तींच्या अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झालेले आहेत त्यांच्या नातेवाईक व समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. आमचे समाजाची स्मशानभुमीविषयी निर्णय घेतांना आमचे समाजाचे लोकांचे काहीएक म्हणणे ऐकुन न घेता बेकायदेशीररित्या सदर ठिकाणी व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे सुरू केले आहे.
त्यामुळे शासकीय निधीचा देखील अपव्यय केला जात आहे. आम्ही चौकशीदरम्यान यापूर्वीच्या तक्रारी व दस्तऐवज सादर करण्यास तयार आहोत. आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात घेवुन सदर स्मशानभुमीवरील अनधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे व संबंधीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गट क्र.१ मधील स्मशानभुमीचे जागेवरील अतिक्रमण काढण्यात येवुन संरक्षण भिंत बांधुन मिळावी आणि सदर स्मशानभुमी पूर्ववत गट क्र.१ मध्ये ठेवण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर शैलेश सोनवणे, अमोल कोल्हे, जितेंद्र शिरसाठ, गोपाल सोनवणे, राजदीप गुरचळ, जिजाबाई सोनवणे,, सिद्धांत सोनवणे, अंबिका भालेराव, पल्लवी शिरसाठ , वनिता शिरसाठ , विद्या सोनवणे , विद्या झनके आदींची स्वाक्षरी आहे.



