जळगाव : प्रतिनिधी
रात्रीपासून आपला पाणीपुरवठा खंडित केला जाईल’, असे बनावट संदेश उद्योजकांना पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे बनावट संदेश असून, त्यावर विश्वास न ठेवण्याविषयी एमआयडीसीने स्पष्ट केले असून, तसे उद्योजकांना कळविण्यासह सायबर पोलिस ठाण्यातही पत्र दिले आहे.

वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे बनावट संदेश पाठवून यापूर्वी अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता एमआयडीसीकडून पाणीपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे संदेश उद्योजकांना येत आहे. मेसेजमध्ये ‘गेल्या महिन्यातील बिल, मीटर रीडिंग अपडेट नसल्याने आपला पाणीपुरवठा रात्री ९:३० वाजेपासून खंडित केला जाईल, असा मजकूर नमूद केला आहे.
बनावट संदेशामध्ये राहुल सिंग नामक एका व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दिला असून, त्यावर संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती अॅप डाउनलोड करण्यास सांगून फसवणूक करीत आहे. अशाच प्रकारे एका जणाची ३६ हजारात तर दुसऱ्याची २२ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांचे नाव अद्याप समोर आले नाही की त्यांनी तक्रार केली नाही. मात्र, हे मेसेज फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



