Home » जळगाव » कुत्र्याच्या भुंकण्यावरुन वाद : तिघांवर प्राणघातक हल्ला

कुत्र्याच्या भुंकण्यावरुन वाद : तिघांवर प्राणघातक हल्ला

जळगाव : प्रतिनिधी

खेडी शिवरातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्या विद्यानगरात कुत्रा भुंकत आहे त्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून परिसरात राहणाऱ्या नागरीकांना दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या – सुमारास घडली आहे. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडी शिवारातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्यास विद्या नगर येथे सोनी वाणी या नामक महिलेचा कुत्रा हा नेहमी या परिसरात भुंकत असतो. परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या आणि लहान मुलांवर धाव घेवून चावा घेण्याचा प्रयत्न करतो. यावर तीन दिवसांपुर्वी देखील महिलेला येथील नागरीकांनी समजावून सांगितले होते. दरम्यान, शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता त्याच महिलेचा कुत्रा हा लहान मुलांवर धावून आला.

त्यावर त्या महिलेला परिसरातील काही नागरिकांनी कुत्रा आवरण्याचे सांगितले. याचा राग आल्याने त्या महिलेने तिच्या ओळखीच्या पाच ते सहा जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यावेळी गल्लीत उभे असलेले चंद्रकांत जीवराम चौधरी (वय-४०), किशोर अर्जुन पाटील (वय ४२) आणि चेतन लक्ष्मण खडसे (वय-३५) सर्व रा. विद्यानगर, जळगाव या तिघांना दगड, लाकडी दांडका आणि फरशी मारून गंभीर दुखापत केली. तर त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी या घटनेत परिसरातील नागरीकांच्या अंगावर देखील दगडफेक करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन अज्ञात व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *