मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच ठाकरे गटाने महायुतीच्या नेत्यांसह गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सैफ हा कलाकार आहे. त्याचे वडील मन्सूर अली पतौडी हे भारतीय क्रिकेटची शान होते. आई शर्मिला टागोरही भारतीय सिनेमातले मोठे नाव. स्वतः सैफला भारत सरकारने ‘पद्म’ पुरस्काराने गौरवले. खुद्द पंतप्रधान मोदी त्याच्या प्रेमात आहेत. अशा सैफवर त्याच्या घरात घुसून चाकूहल्ला करणे धक्कादायक तितकेच रहस्यमय आहे. खुनी हल्ला करणारा सर्व सुरक्षा व्यवस्था भेदून घरात घुसला व नंतर पळून गेला आणि गायब झाला, हे अधिक सस्पेन्स वाढवणारे आहे. पोलिसांना हा सस्पेन्स संपवायचा आहे. दया, कुछ तो करो! असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे.

सामना मधील अग्रलेख देखील वाचा….
मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. वांद्र्यातील सर्वात सुरक्षित इमारतीत अभिनेता सैफ अली खान व त्याची पत्नी करिना कपूर राहतात. त्या इमारतीत एक व्यक्ती आरामात घुसते, अभिनेता सैफच्या घरात प्रवेश मिळवून सैफ व त्याच्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद चाकूहल्ला करून पसार होते याचा अर्थ हल्लेखोर सैफ व त्याच्या कुटुंबीयांच्या ओळखीचाच होता. त्यामुळे सैफवरील हल्ला हा कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहे असे मानायचे काय याबाबत संभ्रम आहे. सैफवरील हल्ल्याने विरोधकांनी प्रश्न निर्माण केले व मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर थातूरमातूर उत्तर दिले. ‘पोलीस तपास करीत आहेत, आम्ही खोलात जाऊन तपास करू, कोणालाही सोडणार नाही, उगाच मुंबईला बदनाम करू नका,’ ही त्यांची उत्तरे आहेत. मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडतात ही त्यांची एकंदरीत भूमिका आहे, पण मुंबईत अशा घटना रोजच घडू लागल्या आहेत व कायद्याची भीती कोणालाच राहिलेली नाही. बँक फ्रॉड व इतर गुन्ह्यांतला एक आरोपी फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर येतो व महायुतीचा विजय झाला म्हणून फडणवीस यांना उचलून खांद्यावर घेतो. फडणवीस त्यास पेढा भरवतात. हाच गुन्हेगार समाजमाध्यमांवरील एका सक्रिय गजाभाऊ नामक मराठी माणसाला उचलून नेण्याची भाषा करतो आणि फडणवीस काहीच घडले नाही अशा आविर्भावात वावरतात.



