मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे.

दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 80 लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र जर सर्वांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही, तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर केवायसीची मुदतवाढ होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
महिलांच्या सुविधेसाठी सरकारने केवायसी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. लाभार्थ्यांना https://ladakibahin.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून केवायसी करावी लागते. मात्र, अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. काहीवेळा वेबसाइट लोड होत नाही, तर काही वेळा ओटीपी मिळत नाही. त्यामुळे महिलांकडून तक्रारी वाढल्या होत्या. या समस्या लक्षात घेऊन सरकारने आता प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. आधी दररोज 5 लाख महिला केवायसी करू शकत होत्या, पण आता ती क्षमता वाढवून 10 लाख महिलांपर्यंत करण्यात आली आहे.



