मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काही मंत्री हे भाजपवर नाराज असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे काही मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा गेल्याची माहिती सूत्रांकडून कळते. यावेळी कल्याण डोंबिवली आणि इतर जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील लोकांना भाजपाकडून फोडले जात आहे याबाबत या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीला शिवसेनेचे काही मंत्री उपस्थित होते. त्यांनी डोंबिवली येथील शिंदे गटाच्या नेत्यांचा भाजप प्रवेश होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कडक भूमिका घेत शिवसेनेच्या मंत्र्यांनाच सुनावलं. त्यांनी उल्हासनगरमध्ये तुम्हीच सुरूवात केली. तुम्ही करणार असाल तर आम्ही चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर ते चालणार नाही असं होणार नाही. असं सांगत त्यांनी इथून पुढे एकमेकांच्या नेते अन् कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नका पण दोन्ही पक्षांनी ही पथ्य पाळली पाहिजेत असं देखील सुनावलं.
दरम्यान, शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी प्री कॅबिनेट बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती. भाजप युती धर्म पाळत नसल्याची सर्व मंत्र्यांची तक्रार होती. निषेध म्हणून एकनाथ शिंगे यांच्या गटाचे काही मंत्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मंत्री संजय शिरसाट देखील मुख्यमंत्र्यांना भेटून निघून गेले. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान, शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी आहे का असं चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं.
एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रवेश झाल्यामुळं काही प्रमाणात नाराजी असू शकते. पण याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. कॅबिनेटमध्ये कोणत्याही पक्षाचा विषय झालेला नाही. सगळ्याच पक्षाचे मंत्री आज कमी होते. भाजपचे काही मंत्री निवडणुकीमुळं मतदार संघात असल्यानं आले नाहीत. – चंद्रशेखर बावनकुळे
भाजप शिवसेनेचे नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेत आहेत. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच उमेदवारांना भाजप आपल्या पक्षात घेत आहे. याबाबत शिंदेंच्या अनेक नेत्यांना पालकमंत्र्यांना विश्वासात न घेताच हे निर्णय घेतले जात आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीत युती धर्म पाळला जात नाहीये असा आरोप शिंदे सेनेच्या अनेक मंत्र्यांनी केला. शिंदे सेनेच्या मंत्र्यांना निधी मिळवताना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. छत्रपती संभाजी नगर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने शिंदे गटाच्या पदाधिकारी अन् नेत्यांचे प्रवेश करून घेतल्याचं शिंदे सेनेचं म्हणणं आहे.



