जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील शेतजमीन विक्रीच्या आमिषाने शिवाजीनगरातील भगवान काशिनाथ सोनवणे (४२) यांची ७ लाख ७४ हजार ७८६ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी राजपूत नाव सांगणाऱ्या महिलेসহ असलम खान अशरफ खान (रा. गेंदालाल मिल), हुसेन मर्चट (रा. नंदुरबार) आणि प्रभाकर सुभाष देशमुख (रा. धुळे) अशा चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, २० जानेवारी ते २८ एप्रिलदरम्यान ही फसवणूक घडली. सोनवणे यांचा रिअल इस्टेट व्यवसाय असून ओळखीतील असलम खान यांनी विवरे (ता. धरणगाव) येथील शेतजमीन विक्रीस असल्याचे सांगितले. जमीन मालक म्हणून अनसूयाबाई शुक्ल नावाच्या महिलेची आणि तिच्या जावयाची भेट घालून दिली. नंतर नंदुरबार येथील हुसेन मर्चट यांनी त्या जमिनीचा व्यवहार माझ्याशी झाल्याचा दावा करीत सोनवणे यांच्याकडून ९९ हजार आणि पुढे २५ हजार रुपये घेतले. कागदपत्रे पाहून व्यवहार १० लाख ३० हजारांना ठरला. दरम्यान २३ फेब्रुवारी रोजी सोनवणे घरी नसल्याने त्यांच्या मित्र मयूर अग्रवाल यांच्या नावाने सौदापावती करून ५० हजार ७८६ रुपये बयाना म्हणून घेण्यात आले. १० मार्च रोजी एक लाख रुपयेही देण्यात आले.
२८ एप्रिल रोजी नोंदणी कार्यालयात गेले असता वेंडरने दाखवलेली कागदपत्रे खोटी असल्याचे सांगितले. तसेच खऱ्या अनसूयाबाई शुक्ल यांच्याशी असलेली ओळख दाखवत उपस्थित महिला ती नसल्याचे स्पष्ट केले. चौकशीदरम्यान महिलेने आपले नाव राजपूत असल्याचे सांगताच तिच्यासोबतचे इतर जण पळून गेले. फसवणुकीची बाब उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



