नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांना सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले. तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय मिळाले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांसाठी सरकारने कोणता प्रस्ताव पाठवला होता हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, अशी मागणी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला हिंदूत्व शिकवू नये, असा पलटवार देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. कोण होतास तू काय झालास तू, असे ट्विट फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून केले होते. यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांना म्हणू इच्छितो की कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलेस तू.. त्यांनी एक पांघरून मंत्री तयार करायला पाहिजे. पांघरून खाते तयार केले पाहिजे. एवढ्या भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी जवळ घेतले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
भाजपचे ‘वंदे मातरम’ हे ‘वन डे मातरम’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदूत्वाच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरेंना डिवचले होते. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, अमित शहा यांनी मला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही. एखाद्या राष्ट्रांत राष्ट्रगीतावरून चर्चा होते. भाजपचे ‘वंदे मातरम’ हे ‘वन डे मातरम’ आहे. कारण त्यांना याची काही पडलेली नाही. भारतात काय सुरू आहे? वंदे मातरम म्हणताना त्यांना भारत माता किती दुःखात आहे हे त्यांना दिसत नाही. अमित शहा मला जे हिंदूत्ववारून म्हणत आहेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे माणसं आहेत. किरेन रिजीजू यांनी म्हटले होते की मी गोमांस खातो कोण मला आडवते. आणि त्यांच्याच सोबत अमित शहा जेवण करताना बसले आहेत. माझ्या हिंदूत्वावर बोलण्या आधी त्यांनी किरेन रिजीजू यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे.
मी मुख्यमंत्री असताना पालघर साधू हत्याकांड झाले होते. त्या साधू हत्याकांडातील व्यक्तीला भाजपमध्ये घेताना तुमचं हिंदुत्व मेले होते का? लाज वाटली पाहिजे अमित शहांना, त्यांनी माझ्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करताना आपल्या बुडाखाली किती अंधार आहे ते पहिले बघायचे आणि मग माझ्यावर आरोप केले पाहिजेत. या न्यायमूर्तींवर ज्या काही गोष्टी आहेत, ती एका केसमुळे नाही, त्यांची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्यावरून वाद आहे. मंदिरात दिवा लावला गेलाच पाहिजे याच विचारांचा मी आणि माझी शिवसेना आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, अधिवेशन हे आता अर्ध्यावर आले आहे. या अधिवेशनात विदर्भासाठी काय दिले यावर देखील चर्चा करणे गरजेचे आहे. हे वर्ष तसे बघायला गेले तर फार कठीण गेला महाराष्ट्राला. अतिवृष्टीचा फटका बसला, अनेक ठिकाणी शेत जमीन वाहून गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक रक्कम घोषित केली, त्या पॅकेजचे पुढे काय झाले हे कोणालाच माहित नाही.



