जळगाव : प्रतिनिधी
वाळू व्यावसायिकांशी आर्थिक हितसबंध असल्याचा आरोप झालेल्या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव उपविभागातील पाच पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी (२१ जानेवारी) काढले.

काही पोलिस कर्मचाऱ्यांचे वाळू व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचा आरोप होण्यासह तशी यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली. त्यानुसार जळगाव उपविभागातील एमआयडीसी, तालुका, शनिपेठ, रामानंद नगर, जिल्हापेठ, एलसीबी व शहर पोलिस ठाणे अशा विविध पोलिस ठाण्यातील नऊ जणांच्या चौकशीसाठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली केली आहे. या उचलबांगडी झाल्यामुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.



