जळगाव | प्रतिनिधी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत असून, महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपकडून या जागेवर दावा कायम ठेवण्यात आला असून, संभाव्य उमेदवारांबाबत विविध नावांची चर्चा सुरू आहे. विशेषतः डॉ. केतकी पाटील यांच्या नावाची पक्षात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप कोणत्याही उमेदवाराच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) देखील या जागेसाठी आग्रही असल्याचे संकेत मिळत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रभावामुळे शिवसेनेचा दावा अधिक मजबूत मानला जात असून, जागावाटपाचा अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांकडून लॉबिंग सुरू असल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार आणि महायुतीतील जागेचा तिढा कसा सुटणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




