मुंबई : वृत्तसंस्था
महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमीच विविध आरोप होत असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पाहिले पाहिजे. ते अजूनही राष्ट्रीय पातळीवरील नेते झालेले नाही. राहुल गांधी हे देशातील नेते आहेत. कोण निवडणूक जिंकतो? यावर नेतृत्व ठरत नाही. बोगस मतदानाच्या माध्यमातून ते नेते झाले आहेत. त्यामुळे फडणवीस हे बोगस नेते असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात नवीन मतदारांच्या संख्येवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली होती. यात वाढलेल्या सर्व मतदारांनी भाजपलाच मतदान कसे केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांना राष्ट्रीय नेतृत्त्व करण्याची इच्छा असेल. मात्र, जो पर्यंत अमित शहा आहेत, तो पर्यंत त्यांना तशी संधी मिळणार नाही. अशा खोचक शब्दात राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात 39 लाख मतदारदारांचे काय होणार? याबाबत मी कालच वक्तव्य केले होते. यातील काही मतदार हे बिहारमध्ये स्थलांतरित होतील तर त्यातील काही दिल्लीत देखील आले होते. माझ्या कार्यकाळात दिल्ली काबीज करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असेल. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांचे मलोमिलन झाले असते तर चांगले झाले असते, अशी खदखद देखील त्यांनी व्यक्त केली. दोघांनी एकत्र निवडणुकीला सामोरे गेले असते तर चित्र वेगळे राहिले असते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.



