मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून थेट मुंबईच्या दिशेने पदयात्रेला सुरुवात केली. आज जरांगे यांच्यासह त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलन राजधानी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचा ताफा मुंबईच्या वेशीवर दाखल होताच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. आज मुंबईतील आझाद मैदानावर त्यांना आंदोलनसाठी आठ तासांची वेळमर्यादा घालून देण्यात आली आहे. यामुळे आता जरांगे आझाद मैदानातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनात जरांगे यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा आंदोलन सहभागी झाले आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. याशिवाय आंदोलनासाठी केवळ पाच हजार लोकांच्या परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लोकांची गर्दी आझाद मैदानावर वाढताना पाहायला मिळत आहे.
आझाद मैदानावर स्वयंपाक करण्यास मनाई करण्यात आली आहे. पण गाड्यांमध्ये स्वयंपाकाचे साहित्य आझाद मैदानाच्या परिसरावर आणण्यात आलं आहे. यामुळे आता मनोज जरांगे यांच्या मोर्चाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सरकारने मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, जरांगे हे आपल्या मागणीवर ठाम आहेत.



