यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील डोणगाव शिवारात प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. चंदू आण्णा नगर) यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. राजकीय वैमनस्यातून पुनगाव येथील सरपंचाने सुपारी देऊन हा गोळीबार केल्याचा तपासात समोर आले.

या संदर्भात बुधवारी (६ ऑगस्ट) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांच्या तपासाविषयी माहिती दिली. प्रमोद बाविस्कर हे हॉटेल बंद करून निघत असताना १० जुलै रोजी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजयकुमार वाढवे, पोउनि शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वल्टे व त्यांच्या सहकाऱ्यांची पथके तयार करून नाशिक, उमर्टी आणि अडावद येथे पाठविली. किशोर बाविस्कर हा पुनगावचा सरपंच असून त्याचे व जखमी प्रमोद बाविस्कर याचे राजकीय वैर होते. त्यातून बाविस्कर याने रवींद्र देशमुख याला सुपारी दिली व त्यासाठी त्याने देशमुख याला युपीआय अॅपने ५० हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर देशमुख याने विनोद व सुनील पावरा यांना सुपारी दिली.
पथकाने दर्शन रवींद्र देशमुख (२५, रा. देशमुख वाडा, अडावद, ता. चोपडा), गोपाल संतोष चव्हाण (२५, रा. अडावद, ता. चोपडा), किशोर मुरलीधर बाविस्कर (४०, रा. कोल्हे हिल्स), विनोद वसंतराव पावरा (२२, रा. अमलवाडी, ता. चोपडा), सुनील सुभाष पावरा (२२, रा. उमर्टी, ता. चोपडा) यांना अटक केले. यावल पोलिस ठाण्याच्या अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अक्षय अजय जयस्वाल (२४, रा. शिवाजी नगर, जळगाव) याला जळगावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (५ ऑगस्ट) अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले.



